राहुरी : तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील मानोरी शिवारामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून विठ्ठल हापसे ह्या शेतकऱ्यावर प्राण घातक हल्ला केला. या घटनेमध्ये शेतकरी बालंबाल बचावला असून किरकोळ जमखी झाला. घटनेनंतर परिसरात घाबरायटीचे वातावरण पसरले आहे.
दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान मानोरी येथील हापसे वस्तीनजीक असलेल्या आण्णासाहेब तोडमल यांच्या ऊसाच्या शेतामध्ये ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना बिबट्या दिसला. सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांना समजताच बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी गर्दी केली. दबा धरून बसलेल्या या बिबट्याने शेजारील शेतात गिन्नी गवत तोडत असलेल्या विठ्ठल रामभाऊ हापसे या शेतक-यावर हल्ला चढवला.
या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांच्या हाताला आणि दंडाला बिबट्याचे नखे लागल्याने विठ्ठल हापसे हे जखमी झाले आहेत.
त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर लगेचच अमजत पठाण यांच्या शेतात पळताना बिबट्या शेतकऱ्यांचे निदर्शनास आल्याने या ठिकाणी परिसरात मोठी गर्दी जमली होती.
वन विभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम राबवावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. बिबट्या आता लोकवस्तीकडे मुक्त संचार करत असून शेतकऱ्यांसह लहान मुलांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे.