
राहुरी: महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनास सोमवार दिनांक ५ मे पासून सुरुवात केली असून यासंदर्भात त्यांनी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.

दिनांक ७ मे २०२५ बुधवार आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या प्रमुख मागण्या मध्ये पुढील बाबींचा समावेश होतो, कृषी सेवकांचा सेवक कालावधी रद्द करून सेवकांना नियमित कृषी सहाय्यक म्हणून पदावर घ्यावे, कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे करावे, सर्व कामकाज डिजिटल स्वरूपात होत असल्याने लॅपटॉप देण्यात यावे, त्याचप्रमाणे कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस देण्यात यावा, त्याचप्रमाणे निविष्ठा वाटप करण्यासाठी भाड्याची तरतूद करण्यात यावी व कृषी विभागाच्या आकृतीबंधास तात्काळ मंजुरी द्यावी, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करताना कृषी महसूल आणि ग्रामविकास विभाग यांना योग्य पद्धतीने जबाबदारीचे वाटप करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या कृषी सहाय्यकांच्या आहेत तसेच मागण्या मान्य न झाल्यास १५ मे पासून सर्व योजनांचे काम पूर्णपणे बंद करण्याचा इशारा संघटनेने दिलेला आहे.

याप्रसंगी राहुरी तालुक्यातील कृषी सहाय्यक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभात अंत्रे, इतर पदाधिकारी व तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक यावेळी उपस्थित होते.



बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा