अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
“पत्रकार हे समाजाचे प्रतिबिंब; ‘ब्रेकिंग’च्या काळात सकारात्मक पत्रकारितेची गरज” – उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर
डोर्लेवाडी येथे 'मराठी पत्रकार दिन' उत्साहात; बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ व सहेली फौंडेशनचा संयुक्त उपक्रम

0
3
9
4
5
7
डोर्लेवाडी (ता. बारामती): “पत्रकार हे समाजाचे खरे प्रतिबिंब आहेत. सध्याच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या स्पर्धेत समाजमन घडवणारी आणि देशाला दिशा देणारी सकारात्मक पत्रकारिता करणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन बारामतीचे उपविभागीय अधिकारी (SDM) वैभव नावडकर यांनी केले.
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ व सहेली फौंडेशन (बारामती) यांच्या संयुक्त विद्यमाने डोर्लेवाडी येथे ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी नावडकर बोलत होते.

आपल्या मार्गदर्शनात नावडकर यांनी शासकीय योजनांच्या प्रसिद्धीमध्ये प्रसारमाध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “शासनाकडून शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ ही बहुउद्देशीय योजना राबवली जात आहे. तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पत्रकारांनी सहकार्य करावे. तसेच, पुण्यातून जागतिक दर्जाची सायकल स्पर्धा सुरू होत असून, तिसऱ्या टप्प्यात ही स्पर्धा सासवड-निरा-मोरगाव मार्गे बारामतीत येणार आहे. या स्पर्धेत परदेशातील अनेक स्पर्धक सहभागी होत आहेत. याबाबत शालेय विद्यार्थी व तरुणांमध्ये जागृती करावी, जेणेकरून त्यांना ही स्पर्धा पाहता येईल.”
या कार्यक्रमात सहेली फौंडेशनच्या वतीने उपस्थित पत्रकारांना स्मृतिचिन्ह आणि वृक्षरोपे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी चांडाळ चौकडी फेम अभिनेते रामदास जगताप आणि सहेली फौंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी आटोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास तहसीलदार स्वप्नील रावडे, सरपंच सुप्रिया नाळे, ग्रामपंचायत सदस्य राणी नेवसे, सचिन निलाखे, अभिनेते रामदास जगताप, पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमनाथ भिले, कार्याध्यक्ष युवराज खोमणे, उपाध्यक्ष राजेश वाघ, सचिव चिंतामणी क्षीरसागर, सुनील जाधव, जयराम सुपेकर, ॲड. गणेश आळंदीकर, महेश जगताप, दत्ता माळशिकारे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जयराम सुपेकर यांनी केले.
सूत्रसंचालन अध्यक्ष सोमनाथ भिले यांनी केले,

तर आभार ॲड. गणेश आळंदीकर यांनी मानले.





