Breaking
अभिव्यक्तीमहाराष्ट्रविशेष लेखसोशल मिडिया

पॅरिस डायरी  भाग १ व भाग २ लेखिका,मैत्रेयी किशोर केळकर (मुंबई)

0 1 6 8 3 8

विशेष लेख……….

PARIS DAIRY पॅरिस डायरी 

आपल्या प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते,तिला आपण कधी  जाहिर करत नाही किंवा असं काही बोलून दाखवायची आपल्याकडे  पद्धतच नसते.

पण आजकाल नवीन येणारी पिढी ज्या नव्या  गोष्टी स्वीकारतेय त्यात आपली बकेट लिस्ट करणं ह्याला ही स्थान दिलं जातंय.

मनातील सुप्त इच्छा जाहिर करून हि पिढी थांबत नाही तर,त्या पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत हि करते.

तर………..

हे सगळं चर्हाट एवढ्यासाठी की माझ्या बकेट लिस्ट मध्ये सगळ्यात वर असलेली जर कोणती इच्छा असेल तर ती म्हणजे युरोप पहाणे.

भारत बराचसा फिरून झाल्यावर,मी आशिया खंडातले काही छोटे पण सुंदर देश पाहिले.त्यात जपान,भूतान,थायलंड,नेपाळ यांची नावे घेता येतील.खरेदीची पंढरी मानली जाणारी दुबई सुद्धा पाहून झाली होती.पण युरोप खंडाचा नंबर काही लागला नव्हता.

मुळात मला कंडक्टेड टूर्स,ग्रुप टूर्स,किमानपक्षी कस्टमाईझ टूर्स करणं मुळीच आवडत नाही.या अशा बंदिस्त मोजून मापून केलेल्या सहलीत मला घुसमटायला होतं.शिवाय एखादा देश म्हटला की ती सगळी नेहमीची ठरलेली ठिकाणं बघणं,तेच ते मराठी जेवण जेवणं किंवा, मग इंडियन जेवणाचा आग्रह धरणं या गोष्टी नको वाटतात.

ज्यांना पुरेसा आत्मविश्वास नसतो,फार रीसर्च करायची इच्छा नसते किंवा मग अजिबात डोक्याला ताप नको असतो ,अशांनी त्यांची सोय जरूर पहावी.मी मात्र यांच्या फंदात पडत नाही.आपली आपली सहल आखायची, भरपूर माहिती जमवायची आणि मग बिंधास्त निघायचं.हा माझा शिरस्ता.ज्या ठिकाणी जाऊ तिथला निसर्ग,तिथली कला,विणकाम,वस्त्रं,ती विणणारे विणकर,महत्वाचं म्हणजे तिथलं खाणं यांचा मी कसून शोध घेते तिथे नवीन ओळखी करून घेऊन,पुढे माझ्या मित्र मैत्रिणींना इथे येणं  कसं सोयीचं होईल,स्वस्तात पडेल या साठी नवी नाती निर्माण करते.ओळखी करून घेते.मग तो माझ्या पहिल्या वहिल्या भुतान सफरीतला सुरेश ठाकुरी असेल किंवा मग गंगटोक चा चक्र ट्रॅव्हलवाला असेल.मनालीमधला मित्र असेल किंवा मग भूज मधला धर्मेश,मणी काम करणाऱ्या वनीता बेन असतील,किंवा मग लक्षद्वीप मधला शमास असेल ही सगळी माझी जिव्हाळ्याची माणसं आहेत. माझ्या सतत संपर्कात असलेली.माझी आठवण काढणारी,मला सतत आमंत्रण देणारी.या सगळ्या खटाटोपा चा उद्देश काय तर आपल्या सारख्या सामान्य लोकांना पैसा जमवून टूर कराव्या लागतात,भरपूर बघायच असतं पण खूप खर्च परवडत नाही.अशांना माझी हि जिव्हाळ्याची माणसं उपयोगी पडतात.छान फिरता येत,अनुभव संपन्न होता येतं.

टूर प्लानिंग हा माझा व्यवसाय नाही.मी टूर आखून देत नाही पण कुणी जाणार असेल तर सर्वतोपरी मदत करते.

माझी एक मैत्रीण राधिका नवरे ही फार सुंदर कलात्मक सहली आयोजित करते.एकदा माझं स्टेटस वाचून तिने फार मोठा गैरसमज करून घेतला ,मी त्यात भूज मधील कलाकारांची माहिती दिली होती, हातमागाच्या साड्यांची माहिती दिली होती हि सर्व माहिती आणि कलाकार यांचा राधिकाशी किंवा राधिका आपल्या टूरमधे ज्यांच्याकडे जाते त्यांच्याशी काहीही संबंध नव्हता,तरीही कसा कोण जाणे तिने गैरसमज करून घेतला,तिला वाटलं मी नवीन व्यवसाय सुरू केलाय.

माणसाच्या मनात किती असुरक्षितता असते नाही?  त्या असुरक्षिततेच्या भीतीपोटीच राधिकाने गैरसमज करून घेतला असावा.खरं तर स्टेटस वर माहिती देताना राधिकाचा असा गैरसमज होईल असं अगदी  मुळीच वाटलं नव्हतं.

मला राधिकाच्या टूर आवडतात मी तिच्या बरोबर एक  टूर केली सुद्धा आहे,पण त्या मला आर्थिक दृष्ट्या परवडत नाहीत.राधिकाचं या क्षेत्रातलं काम खूप आहे.तिच्या टूर या निश्चित चं वेगळ्या आणि उत्कृष्ट असतात,अगदी अनुभवण्यासारख्या असतात.

रसिक जाणकारांनी जरूर जावं.मी फिरते ती इंटरनेट,पुस्तकं,यू ट्यूब आणि तोंडी मिळालेल्या माहितीच्या आधारे.नवीन माहिती मिळवायची,ती सतत अद्ययावत करायची या गोष्टी मला आवडतात.

आता हे सगळं लिहायचं का? याच्या प्रयोजनाकडे वळूया.

प्रवास वर्णन हा साधारण प्रत्येक व्यक्तीला वाचायला आवडणारा असा साहित्य प्रकार आहे तसा मलाही तो आवडतो.

या प्रवासवर्णन प्रकारात काही पुस्तकं ही धाडसी प्रवासाची वर्णने रेखाटतात तर काही आपला स्वानुभव व्यक्त करतात.काही प्रवासी ठिकाणांची इत्यंभूत माहिती देतात.तर काही नुसती प्रवासी आकर्षणांची जंत्री मांडतात.काही काव्याच्या अंगाने जात तरल प्रवास घडवतात तर काही फार आत्मियतेने आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहितात.काही तर इतकी मजेदार असतात की ती कंडक्टेड टूर्स बरोबर आपण कसा प्रवास केला त्याच्या वर्णनात मष्गूल असतात.अर्थात यात वाईट काहीच नाही.

प्रवास म्हणजे तरी काय? आपल्या अनुभवाच्या पुस्तकाला जोडलं गेलेलं नव पानं.अनुभव मग तो चांगला किंवा वाईट असो आपल्याला बरंच काही शिकवून जातो.

मग या सगळ्या गर्दीत मी का लिहायचं तर त्याचं माझं असं उत्तर म्हणजे……..

माझ्या लेखनाने जर कुणाला प्रवासाची इच्छा होऊन   कोणी मुक्त प्रवासाला निघालं,निदान कोणी प्रवास करण्याची कल्पना केली तरी मला सार्थक झाल्यासारखं वाटेल.

तर …..

नमनाला घडाभर तेल झालं..

आता सुरूच करते.

नाही का?

Paris डायरी -२

वेदव्रत (माझा मुलगा) स्टूडंट एक्सचेंज कार्यक्रमाअंतर्गत निवडला जाऊन त्याला सहा महिन्यांसाठी पॅरिस ला जायला मिळणार होतं.

सेप्ट युनिव्हर्सिटी तर्फे तो जात असल्याने त्याच्यासाठी तर ते उत्तम होतंच,पण अधिक सुरक्षित आणि संपन्न करणारं होतं.

वेदव्रताच्या जाण्याची तयारी करत असताना माझ्यातलं प्रवासी मन आतल्या आत बेत आखायला लागलं होतं.आपण वेदव्रतला भेटायला जाऊ त्यावेळी युरोप पहाण्याचा बेत केला तर!

आम्हा नोकरी करणाऱ्याचां सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रजा.मला रजा हा प्रश्न सतावत होताचं.सुदैवाने वेदव्रतचा अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी जूनच्या सुमारास होता.त्याला त्या दरम्यान सुट्टी हि मिळणार होती.मग जर मे महिन्यातला कार्यक्रम आखला तर ……

आता मला युरोपची स्वप्न पडू लागली होती.अगदी दिवसाढवळ्या सुद्धा.पण वाटलं तितकं हे सोपं नव्हतं.संन्याशाच्या लग्नाला शेंडी पासून तयारी तशी माझी पासपोर्ट पासून तयारी होती.

कोविडच्या सुमारास माझ्या पासपोर्टची मुदत संपली होती.रीन्यू करावा तर ते त्यावेळी अशक्यच होतं.झालं राहिलं.पुढे जेव्हा प्रयत्न केला त्यावेळी कळलं आता रीन्यूव्ह न होता नवीन काढावा लागेल.दरम्यान रहातं घर बदलून भाड्याच्या घरात रहायला गेलो होतो.भाडेकरूंसाठी संकटाची जी मालिका असते त्याबद्दल अनभिज्ञ होते.

खरं तर आम्ही त्याच गावात पुर्वेकडून पश्चिमेला रहायला आलो होतो.म्हणजे फार काही मोठा बदल  झाला नव्हता,पण आपल्या सरकारची सामान्य नागरिकांबद्दलची जागरूकता इतकी जास्त आहे की मला प्रत्येक वेळी मी भारताची नागरीक आहे,या या पत्यावर रहाते हे पटवावं लागत होतं.

जुनं घर लहान पडतं म्हणून बदललं ,मोठं घर भाड्याने घेतलं आणि मोठी संकट पदरात पाडून घेतली.

दोन वेळा online application केली कागदपत्र जमवली पण प्रत्येक वेळी काही न काही खुसपट निघे आणि पासपोर्ट होत नसे. दोन वेळा प्रयत्न करून पाहिल्यावर तिसऱ्यावेळी एजंटला शरण गेले.

त्याने पैसे द्यायची तयारी आहे,म्हटल्यावर हव्या त्या दिवशी हव्या त्या ठिकाणी apointment घेऊन दिली.आहे की नाही गंमत.मी जेव्हा इमानदारीत online घेण्याचा प्रयत्न करत होते तर हवी ती तारीखच मिळत नव्हती.

मला काय सुचित करायचंय हे एव्हाना लक्षात आलं असेलच तुमच्या.

आता महत्वाचं होतं ते कागदपत्र जमवणं.जुनं घर जवळच होतं .एकाच गावातलं म्हणून bank पासून आधार पर्यंत कुठेही पत्ता बदलला नव्हता.आता ते करणं आलं .खरंतर पहिल्या घरी आम्ही परत रहायला जाणार आहोत मग तो पत्ता का बदलावा म्हणून मी जरा नाखूश होते.एजंट जवळ त्याचंही उत्तर होतं.त्याने मला बँकत जाऊन रेंट अग्रीमेंट ची झेरॉक्स देऊन पत्ता बदलायला सुचवलं.तेही नॅशनलाईज बँकेत.पासबुकवर नवीन पत्ता टाकून सही शिक्का मिळवला.

एक काम झालं,आता घरमालकाचं ना हरकत प्रमाणपत्र हवं होतं.मालक अमेरिकेत.त्याच्या आईच्या नावावर घर,आई ८० वर्षांची,

बरं मालकाचा नंबर मिळेल म्हणून ॲग्रीमेंट वाचलं तर आमच्या हुशार ब्रोकर ने मालकाच्या नंबरच्या जागी स्वतः चा नंबर दिलेला.झालं त्याला फोन लावला.बाबा नंबर हवाय, नंबर दे तर म्हणतो कसा वेळ मिळाला की मीच त्यांना फोन करेन.मग बघू.

अरे हि काय मोगलाई आहे का?

मालकाचा नंबर नको मिळायला ? माझ्यातला सुप्त पण मवाळ क्रांतिकारक जागृत झाला.

सोसायटीत सेक्रेटरीला संपर्क केला तर तो पठ्ठ्या नंबर देईना.

एक नवं गणित उलगडत होतं.

मालकाचा नंबर सहजासहजी मिळाला नाही की दर वेळी अग्रीमेंट संपल्यावर भाडेवाढ करण्याची संधी हे ब्रोकर घेतात.मालकाला वाढीव भाडं मिळणार असतं आणि भाडेकरूंना हाच मार्केट दर आहे म्हणून फशी पाडता येतं .परिणामी ब्रोकरला वाढीव ब्रोकरेजचं कुरणं सदैव उपलब्ध होतं रहातं.एवढे वळसा वळणे घेऊन मला हे बहुमोल ज्ञान मिळालं होतं.

एकदा हे कळल्यावर मी अगदी चंगच बांधला.

आजूबाजच्या  शेजाऱ्यांकडे चौकशी केली पण कोणीही या lobby च्या विरोधात जायला तयार नव्हतं,पण शेजारच्या एका भल्या काकूंनी मात्र ओनर ग्रूप वरून नंबर काढून दिला.

लगेच मालकाला मेसेज केला.मेसेज का ? तर आपल्या आणि अमेरिकेच्या वेळांच त्रांगडंच आहे ना ! ते झोपले की आपण जागे,आणि आपण झोपलो की ते जागे.

यावेळी नशीब जरा बरं होतं.मेसेजला उत्तर आलं.त्याने आईचा पत्ता आणि फोन नंबर पाठवला.लगोलाग मी त्या माऊलीला भेटायला गेले.नमस्कार चमत्कार झाल्यावर त्या आजींनी मला जेवायलाचं बसवलं.मी शाळेतून दमून येणार तेही एका त्यांच्या सहीसाठी यांचं त्यांनाच खूप वाईट वाटत होतं.फार प्रेमाने मला त्यांनी जेऊ घातलं. अचानक त्यांच्या घरातील रमण महर्षींचा फोटो मला दिसला आणि मग काय आमची गाडी भरधाव सुटलीच.लहानपणापासून के .वि.बेलसरे म्हणजे माझे गुरू ज्यांना मी बाबा म्हणायचे,त्यांचा पायाशी बसून रमणांच्या कित्येक गोष्टी ऐकल्या होत्या.मला ते आठवून हुरूप आला .रमण महर्षींच्या बद्दल खूप बोललो दोघी. अम्मांशी माझी चक्क दोस्ती झाली.आता तर मी त्या आणि त्यांचा मुलगा असं छान गोड नातचं निर्माण झालंय.

थांबा थांबा तुम्ही नक्कीच त्या ब्रोकरच्या प्रतिक्रियेचा विचार करत असाल ना?

तर त्याचा अस्सा काही जळफळाट झालाय म्हणून सांगू.त्याने आता चक्क आमच्या बाबतीत अडवणुकीचं धोरण धरलय.

“But who cares”

सत्य हे स्वयंप्रकाशी असतं….नाही का?

प्रकाश थोडा प्रखर असतो पण चालायचंच

तर आता आमची गाडी कागदपत्र संपन्न होऊन पासपोर्ट ऑफिसला पोहोचली एकदाची.

तिथे या रांगेतून त्या रांगेत असे चेंडू टोलवल्यासारखे धक्के खात प्रत्येक वेळी ही फोटो मधली ,आधार कार्ड वाली बाई मीच असं सुमारे चारपाच वेळा पटवून दिलं.सरकार किती जागरूक असतं आमच्या सारख्या भयंकर धोका दायक माणसांप्रती यांची पुन्हा एकदा जाणीव झाली.

दरम्यान लाईनीत एक गृहस्थ भेटले.साधारण सत्तरीचे असतील.त्यांची आणि माझी छान ओळख झाली.ते अफ्रिकेत असतात.तिथे खूप वर्ष त्यांनी काम केलंय.मग काय विषय कमी का होते ! गांधीजींच्या स्टेशनवरून निघालेली गाडी नेल्सन मंडेला पर्यंत येऊन थांबली.एक एक काऊंटर ओलांडत आम्ही दोघं परत परत भेटत होतो,आणि आमचं बोलणं पुढे सरकवत होतो.त्यांनी खूप वेगळी पण धक्कादायक अशी स्वानुभवाच्या आधारे माहिती दिली.ती काही मी इथे सांगत नाही,कारण मग फारच गोंधळ होईल.फक्त त्यांचं एक वाक्य तेवढं सांगते त्यावरून कल्पना करा.

ते म्हणाले,’गांधींनी अफ्रिकेत राहून सगळ्या भारतीय माणसांच्या आयुष्यातले प्रश्न अधिक जटील करून ठेवलेत.,”आता बोला.हे काय आहे ते त्यांच्या कडूनच ऐकण्यासारखं आहे.

एकंदर दोन एक तास मेहनत केल्यावर एकदाची शेवटच्या काउंटरवर पोहोचले.तिथे एक मराठी गृहस्थ होते.त्यांनी अतिशय संशयाने माझ्याकडे पाहून पुन्हा एकदा सगळे अथ पासून इथीपर्यंत प्रश्न विचारले.मग बराच गंभीर विचार करून.मला या फोटोतल्या तुम्हीच ना असं विचारलं.फोटोत दिसणारी मी दाट  केस असलेली आणि बऱ्यापैकी तरूण दिसत होते.अर्थात हा फोटो जुना होता.

खरंतर डोळे ,फोटो,हाताचे ठसे असले सगळे पुरावे आधीच्या काउंटरवर देऊन झाले होते.वय वाढणं हे माणसाच्या आवाक्याबाहेरच होतं.त्याला मी तरी काय करणार होते.नाही म्हणायला लेटेस्ट फोटो लावायला हवा होता.पण मग आधी काढलेल्या त्या भरमसाठ फोटोंची काय करायचं म्हणून जुनाच लावला होता.

तत्वतः समोर बसलेल्या गृहस्थांना फक्त आणि फक्त शिक्का मारायचा होता.पण आपल्याकडे मोठाच अधिकार आहे आणि तो आपण फार सजगपणे वापरतोय हे आपल्या सगळ्यांनाच फार दाखवायचं असतं.त्यानुसार त्यांनी मला उद्या या आणि नवीन फोटो आणा असं सांगितलं.

मला या क्षणी अगदी निराशा वाटली.एक फोल पणाची जाणीव होऊन मी दीर्घ श्वास घेतला आणि फक्त “बरं” एवढंच म्हणाले.या बरं मधे बरंच काही होतं.उद्या पुन्हा एकदा सुट्टी घ्यावी लागणार होती.आजच ती मोठ्या मुश्किलीने मिळाली होती.उद्या परत कसं जमावं.असंख्य विचार त्या एका बरं मधे होते.

पण का कोण जाणे माझ्या बरं या उद्गाराने काय वाटलं म्हणून त्या गृहस्थांनी मला रिसीटवर शिक्का मारून दिला आणि नाही आलात उद्या तरी चालेल असं सांगितलं.

समोरच्या व्यक्तीच्या निर्णयात बदल होण्या आधी मी तिथून निघाले ती थेट बाहेर.

आता पुढचा टप्पा पोलीस व्हेरिफिकेशन.

दोन दिवसांत संध्याकाळी एक पोलीस साध्या वेशात पडताळणीसाठी आले.परत एकदा सगळी कागदपत्रं तपासली गेली.शेजाऱ्यांकडे चौकशी झाली आणि उद्या पोलिस स्टेशनला अमूक वाजता या असं सांगून ते निघाले.

दुसऱ्या दिवशी रविवार होता.मी ठरलेल्या वेळी गेले आज मात्र मी बरोबर लेटेस्ट फोटो ठेवला होता.

सगळे सोपस्कार पुर्ण केले आणि पुढची प्रक्रिया कधी चालू होतेय यांच्या sms ची वाट पहात राहिले.दहा दिवस झाले काही मेसेज नाही.एप्रिल संपत येत होता.यानंतर व्हिजा करायचा सगळं सुटीच्या वेळेत जमायचं तरी कसं.मला प्रश्न पडत होते पण उत्तरं नव्हती.दरम्याने अनेक सुट्या आल्याने तेवीसाव्या दिवशी पासपोर्ट येत असल्याचा मेसेज आला.

मी घरी राहून वाट पहात होते.दुपारी स्पीडपोस्ट विभागातले पोस्टमन आले.परत आधार ,pan अशी सगळी परेड झाली.झेरॉक्स घेतल्या आणि मग रेंट अग्रीमेंट ची कॉपी मागितली .खरंतर रेंट अग्रीमेंट खूप मोठं असतं.पुरावा म्हणून शेवटच्या  एका सर्व समावेशक पानाची फोटो कॉपी दिली तरी भागत.पण समोरचे ग‌हस्थ अख्खी अग्रीमेंट कॉपी मागत होते.मला आता हसावं की रडावे ते कळेना.माझ्याकडे मुळात एकच कॉपी होती.सासूबाईंना घरात एकटं सोडून खाली जाऊन झेरॉक्स आणावी तर जाणंही शक्य नव्हतं,आणि हे महाशय पासपोर्ट काही देईनात.

शेवटी मुख्य ऑफीसात या असं दरडावून हे महाशय गेले.

संध्याकाळी पाचच्या आत जायचं होतं.मुलगी घरी आल्यावर मी पोस्ट ऑफिस मधे गेले.संध्याकाळी साडेसहाला जेव्हा ते पोस्टमन आले आणि त्यांनी माझी अग्रिमेंट कॉपी घेतली तेव्हा पासपोर्ट हातात मिळाला.

एकंदर ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला दमवणार हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.

इथे तुमच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न आला असेल की तात्काळ पासपोर्ट मिळतोच की.मग तो का नाही केला तर याला कारण असं की पहिल्या दोन वेळी एजंटला टाळून स्वतःचं काम स्वतः करण्याच्या नादात जे प्रयत्न मी केले होते त्यामुळे मला तात्काळ ही सुविधा उपलब्ध नव्हती.

आता व्हिजा करायचा.मग परत लागले कामाला.भलीमोठी फी घेऊन एजंटने व्हिजा ची तारीख घेतली.शाळेच ना हरकत प्रमाणपत्र ,कव्हरींग लेटर,आयकरची कागदपत्र बँकेतली ठेव.मुलाकडून आलेलं आमंत्रण पत्र त्याच्या पासपोर्ट,व्हिजाची झेरॉक्स,सोबत इंश्युरन्स आणि प्रवासाचा आराखडा,डमी तिकीट असं जाडजूड बाड तयार करून १६ तारखेला Paris consulate मधे पोहचले.तिथे चार तास झगडून काम पार पाडलं. लागणाऱ्या जास्तिची कागदपत्र वेदव्रत तात्काळ पाठवत होता.

सगळं काम करून घरी आले तोवर खरचं थकून गेले होते.

आता परत वाट पहाणे आलं.पण यावेळी तिसऱ्या दिवशी व्हिजा येतोय असा मेसेज आला.मागच्या अनुभवाने मी सगळ्या झेरॉक्स हाताशी ठेवल्या होत्या.पण डिलिव्हरी साठी आलेल्या माणसाने फक्त माझं नाव खात्री करून घेतलं आणि सही घेऊन हसत मुखाने तो गेला.माझ्यासाठी हा सुखद धक्का होता.

इतके दिवस मी पोलिसांत, पोस्टात हिच मी असं पटवून देण्यात जी शक्ती खर्च केली होती त्या पार्श्वभूमीवर हे म्हणजे फारचं चांगलं वागणं होतं.आज युरोप मध्ये फिरताना जेव्हा मी या सगळ्या गोष्टींचा विचार करते तेव्हा वाटतं आपल्याकडची काही काही खाती ही माणसांच्या सुविधेसाठी नाही तर माणसांचा छळ करण्यात धन्यता मानणारी आहेत.युरोपही कडक तपासणी होतेच अगदी प्रत्येक टप्प्यावर पण त्यात हा अविश्वास,पिडवणूक करण्याची भावना नसते,होता होई तोवर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होताना दिसतो.

या आणि अशा बऱ्याच गोष्टी मला या प्रवासात जाणवत आहेत.अर्थात इथलं सगळंच फार छान आणि आपल्या कडे कसं वाईट असा निष्कर्ष मी मुळीच काढत नाही.

पण आपण अजून कुठे बदलायला हवं (हे मी व्यक्तीश: म्हणतेय) हे मला जाणवतंय.मी सुद्धा एका शाळेत,एक सामान्य का असेना शिक्षिकेच्या पदावर गेली अनेक वर्षे काम करतेय.शाळेतली साधी कामं पालकांसाठी जटील होऊ नयेत ,उलट ती सुकर कशी होतील याचा एक वेगळा धडा मला यातून मिळतोय.

म्हटलं ना प्रवास आपल्याला शिकवतो तो हा असा छोट्या छोट्या गोष्टीतून.

तर मग……

आता निघू या ना पुढच्या खऱ्या खुऱ्या प्रवासाला,Paris ला.

लेखिका,

मैत्रेयी किशोर केळकर

mythreye.kjkelkar@gmail.com

ता.क: लिहिलेलं आवडतं असेल तर मला आपली प्रतिक्रिया कळवा,नक्की मेल करा,तुमची प्रतिक्रिया मला लिहायला आणि लेखनाच्या सुधारणेला सुद्धा प्रेरणा देणारी असेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे