बारामती: शासनाच्या ई-चलन प्रणालीविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असतानाच, आता बारामती तालुक्यातील विविध वाहतूक संघटनांनी या प्रणालीतील जाचक त्रुटी दूर करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामती तालुका विद्यार्थी वाहतूक संघ आणि संलग्न संघटनांच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांना नुकतेच एक निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या कार्यान्वित असलेल्या ई-चलन प्रणालीमुळे विद्यार्थी वाहतूक, मालवाहतूक आणि रिक्षा व्यावसायिकांना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे चुकीच्या पद्धतीने दंड आकारला जातो. काही प्रकरणांमध्ये फोटो किंवा वाहन क्रमांकामध्ये स्पष्ट त्रुटी असूनही थेट दंडात्मक कारवाई केली जात असल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
संघटनेच्या प्रमुख तक्रारी आणि मागण्या:
* चुकीची दंड वसुली: तांत्रिक चुकांमुळे होणारी अन्यायाकारक दंड वसुली तातडीने थांबवावी.
* तक्रार निवारण प्रक्रिया: ई-चलन संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, वाहनधारकांना कार्यालयाचे वारंवार उंबरठे झिजवावे लागतात. ही प्रक्रिया सुलभ करावी.
* पारदर्शकतेचा अभाव: ही प्रणाली वाहतूक नियंत्रणापेक्षा केवळ ‘दंड वसुलीचे साधन’ बनली असल्याची भावना वाहनधारकांमध्ये निर्माण झाली आहे.
* तातडीने दखल: प्रशासनाने या त्रुटींची त्वरित चौकशी करून संबंधित स्तरावर या विषयाचा पाठपुरावा करावा.
या निवेदनावर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक संघटना कार्याध्यक्ष तानाजी बांदल, जिल्हाध्यक्ष जाहिद बागवान, बारामती तालुकाध्यक्ष गणेश सावंत, उपाध्यक्ष गणेश कणसे सचिन मुळीक, जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने, सामाजिक कार्यकर्ते अनिल खुडे, भूपेंद्र जाधव या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जर प्रशासनाने यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बारामती परिसरातही तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा