अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र
जनतेचे सेवक की हुकूमशहा? वर्दी ही कायद्याची ताकद आहे, दादागिरीचा परवाना नाही.
नियम शिकवणाऱ्यांचाच नियमभंग? पोलिसांच्या एकंदर कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह

0
7
7
3
2
9
पुणे : कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनीच कायदा आणि शिस्त पायदळी तुडवली तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? डेक्कन पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप कदम यांचे नुकतेच एका कॅफेमधील कथित गैरवर्तन उघड झाले. रात्रपाळीवर असताना कॅफेमध्ये जाऊन ग्राहकांना दमदाटी करणे, काठीने कॉफीचे ग्लास व खाद्यपदार्थ खाली पाडणे आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरणे, हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
पण या निमित्ताने संपूर्ण व्यवस्थेवर आणि पोलिसांच्या सर्वसामान्यांसोबतच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली म्हणजे विषय संपला, असे नाही. खरा प्रश्न असा आहे की, वर्दीचा रुबाब दाखवून नागरिकांशी मनमानी करण्याचे धाडस नेमके येते कुठून? शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि पब यांनी नियम पाळावेत, वेळेत व्यवसाय बंद करावा, अशी कठोर भूमिका पोलिस प्रशासन घेत असते. मात्र, त्याच नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संयम, शिष्टाचार आणि कायदेशीर प्रक्रिया पाळणे तितकेच आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करायची, पण ती कायद्याच्या चौकटीत की काठीच्या जोरावर, हा प्रश्न या घटनेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे. जर सीसीटीव्ही नसता आणि व्हिडिओ व्हायरल झाला नसता, तर हा प्रकार कधी समोर आला असता का, असा रास्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.




