Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र

जनतेचे सेवक की हुकूमशहा?  वर्दी ही कायद्याची ताकद आहे, दादागिरीचा परवाना नाही.

नियम शिकवणाऱ्यांचाच नियमभंग? पोलिसांच्या एकंदर कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह

0 7 7 3 2 9

पुणे : कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनीच कायदा आणि शिस्त पायदळी तुडवली तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? डेक्कन पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप कदम यांचे नुकतेच एका कॅफेमधील कथित गैरवर्तन उघड झाले. रात्रपाळीवर असताना कॅफेमध्ये जाऊन ग्राहकांना दमदाटी करणे, काठीने कॉफीचे ग्लास व खाद्यपदार्थ खाली पाडणे आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरणे, हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

पण या निमित्ताने संपूर्ण व्यवस्थेवर आणि पोलिसांच्या सर्वसामान्यांसोबतच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली म्हणजे विषय संपला, असे नाही. खरा प्रश्न असा आहे की, वर्दीचा रुबाब दाखवून नागरिकांशी मनमानी करण्याचे धाडस नेमके येते कुठून? शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि पब यांनी नियम पाळावेत, वेळेत व्यवसाय बंद करावा, अशी कठोर भूमिका पोलिस प्रशासन घेत असते. मात्र, त्याच नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संयम, शिष्टाचार आणि कायदेशीर प्रक्रिया पाळणे तितकेच आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करायची, पण ती कायद्याच्या चौकटीत की काठीच्या जोरावर, हा प्रश्न या घटनेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे. जर सीसीटीव्ही नसता आणि व्हिडिओ व्हायरल झाला नसता, तर हा प्रकार कधी समोर आला असता का, असा रास्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

सदर घटना ही प्रातिनिधिक असली, तरी यातून समोर येणारे वास्तव अधिक विदारक आहे. एकूणच पोलिसांच्या वर्तणुकीबद्दल समाजात तीव्र नाराजी आहे. अनेकदा न्याय मागण्यासाठी किंवा अडचणीत सापडलेला सामान्य नागरिक जेव्हा पोलिस ठाण्यात जातो, तेव्हा तिथेही त्याला सन्मानजनक वागणूक दिली जात नाही. रस्त्यावर प्रवास करतानाही वाहतूक पोलिसांकडून अनेकदा नागरिकांवर अरेरावी केली जाते. आपण याच जनतेचे सेवक आहोत आणि नागरिकांच्या संरक्षणासाठीच आपली नियुक्ती झाली आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट पोलिसांकडून गांभीर्यपूर्वक विसरली जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी या प्रकरणात निलंबनाची कारवाई करून संदेश देण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे, परंतु अशा घटना घडल्यानंतर आणि समाजमाध्यमांवर संताप व्यक्त झाल्यानंतरच कारवाई का होते, याचे उत्तर मात्र अद्याप मिळालेले नाही. 

पोलीस जनतेचे सेवक आहेत की हुकूमशहा? अशी एक समाजात भावना तयार झाली आहे,पोलिसांना विसर पडलाय की वर्दी ही कायद्याची ताकद आहे, दादागिरीचा परवाना नाही.

पोलिस दलाची प्रतिमा काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या अशा मनमानी वर्तनामुळे डागाळत असेल, तर जबाबदारी निश्चित करून भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी आणि पारदर्शक यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. वर्दी ही कायद्याची ताकद आहे, दादागिरीचा परवाना नाही; हा धडा प्रत्येक अधिकाऱ्याने लक्षात ठेवण्याची वेळ आता आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे