Breaking
अपघातआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामती बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीवर धडक कारवाई; पण शहराबाहेरील ‘मृत्यूच्या सापळ्यांचे’ काय? २०० मीटरच्या परिघाबाहेर अवैध वाहतुकीचा सुळसुळाट; प्रशासनाचे डोळे एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच उघडणार का?

0 7 2 0 9 7

बारामती: राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी आणि बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, बारामती बसस्थानकाच्या २०० मीटर नो पार्किंग झोन मध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी स्थानिक पोलीस, एसटीची सुरक्षा व दक्षता शाखा आणि आगार प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून २० अवैध आणि नो-पार्किंगमधील वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.

राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या निर्देशांनुसार आणि पोलीस उपमहानिरीक्षक तथा मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अशाच प्रकारची मोहीम नियमितपणे राबवून अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर मोहिमेत एसटीचे वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी विजय धनगर (पुणे), राखण व पहारा निरीक्षक इंगळे, सुरक्षा निरीक्षक लादे, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.प्रदीप काळे, दत्तात्रय भोसले, आकाश कांबळे, म. पो. हवा. सुनीता पाटील,आशा शिरतोडे तसेच बारामती आगाराचे व्यवस्थापक शिंदे,वाहतूक निरीक्षक पवार, सावंत आणि सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक कदम यांनी सहभाग घेतला.

…तरीही हे प्रश्न अनुत्तरितच! 

एसटी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात कारवाईचा देखावा प्रशासनाने उभा केला असला, तरी या हद्दीबाहेर आणि बारामती शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मुख्य मार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय राजरोसपणे आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरूच आहे. यावर कारवाई कोण करणार आणि कधी करणार, हा खरा प्रश्न आहे.

१. रस्त्यावर धावताहेत ‘मृत्यूचे सापळे’:
शहराबाहेर आणि ग्रामीण भागात धावणाऱ्या या बहुतांश अवैध वाहनांकडे फिटनेस सर्टिफिकेट (योग्यता प्रमाणपत्र) नाही. वाहनांची अवस्था अतिशय विदारक आणि भंगार झाली आहे.

२. प्रवाशांच्या जिवाशी खेळ:
अनेक वाहनांना काचा नाहीत, तर काहींच्या आतमध्ये बसायला साध्या सीट्सही शिल्लक नाहीत. वाहनांच्या आतमध्ये लोखंडी अँगल किंवा पत्र्यासारखे टोकदार भाग बाहेर आलेले आहेत. अशा वाहनातून प्रवास करताना प्रवाशांना गंभीर दुखापत किंवा इजा होण्याचा मोठा धोका आहे. तरीही पैशांच्या लालसेपोटी हे वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना कोंबून त्यांची ने-आण करत आहेत.

३. प्रशासनाचा अंकुश कुठे आहे?
एकीकडे एसटी महामंडळ २०० मीटरच्या कारवाईवर पाठ थोपटून घेत आहे, तर दुसरीकडे आरटीओ आणि स्थानिक वाहतूक पोलिसांचे शहराबाहेरील या जीवघेण्या वाहतुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. या भयानक अवस्थेत धावणाऱ्या वाहनांची तपासणी कोण करणार? त्यांच्यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही का?

४. प्रशासनाला दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का?
सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न इथे ऐरणीवर आला आहे. एखाद्या दिवशी या फिटनेस नसलेल्या, तुटक्या-फुटक्या वाहनाचा मोठा अपघात होऊन निष्पाप प्रवाशांचे बळी गेल्यानंतरच या झोपलेल्या प्रशासनाचे डोळे उघडणार का? असा संतप्त सवाल आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

दिखाऊ कारवाईपेक्षा प्रशासनाने मुळावर घाव घालून प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या या अवैध आणि धोकादायक वाहतुकीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे