
मुंबई : १ जुलै रोजी असलेल्या कृषी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. याच अनुषंगाने, कृषी क्षेत्रातील प्रसार आणि जनजागृतीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल बारामतीचे युवा पत्रकार योगेश नालंदे यांना २०२४ या वर्षाचा ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे. मुंबई येथे पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात राज्याचे राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या दिमाखदार सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच भरतशेठ गोगावले यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
योगेश नालंदे यांनी कृषी पत्रकारितेत केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत तब्बल ३६५ शेतकऱ्यांच्या यशोगाथा शोधून त्यांना वृत्तपत्रांच्या माध्यमातून राज्यभर मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. या यशोगाथांमधून इतर हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली असून, शेतीविषयी सकारात्मक संदेश पोहोचवण्यात त्यांनी मोठे कार्य केले आहे. याशिवाय, कृषी वाहिनीवर काम करत असताना त्यांनी बाजारभाव, हवामानाचा अंदाज आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कल्पक अशा नाट्यरूप ऑडिओची निर्मिती करून त्याचे रेडिओवरून प्रसारण केले. डिजिटल माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी ‘शेतकरी योद्धा’ या नव्या वृत्तपत्राचीही सुरुवात केली आहे. त्यांच्या याच महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच, महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून भविष्यातही त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत राहील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा