शिक्रापूर (दि. २१): पुणे शहरालगतच्या शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असताना गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या सूचनेनुसार गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगाराला महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांच्या आदेशाने स्थानबद्ध करण्यात आले आहे.

गणेश भाऊसाहेब फडतरे (वय ३५, रा. फडतरेवस्ती, कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे) असे या कारवाईत स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात शिक्रापूर आणि लोणीकंद पोलीस ठाण्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, बेकायदेशीर जमाव जमवून अग्निशस्त्रासह हल्ला करणे, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि बालकाचे अपहरण करून मारहाण करणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.
तत्कालीन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या आदेशावरून आरोपीच्या गुन्हेगारी कारवायांचा सविस्तर अभिलेख तपासून एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रस्तावातील पुरावे आणि गुन्हेगारी स्वरूप विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश फडतरे याला धोकादायक व्यक्ती या सदराखाली स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीला ताब्यात घेत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
ही धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये शिक्रापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, व सध्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर तसेच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार रोहिदास पारखे, अमोल दांडगे, श्रीमंत होणमाने, शिवाजी चितारे, मच्छिंद्र निश्चित, राम जाधव आणि नारायण वाळके यांनी सहभाग घेतला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा