Breaking
अभिव्यक्तीगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बारामतीमध्ये पोलिसांवर हल्ला; गुंडांवर गंभीर गुन्हे दाखल

0 7 7 7 7 1

बारामती: शहरातील आमराई परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर समाजकंटकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात पाच जणांसह त्यांच्या इतर साथीदारांवर भारतीय न्याय संहिता आणि आर्म्स ॲक्टनुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना १० जुलै २०२६ रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आमराई परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि गोंधळ सुरू असल्याची माहिती डायल ११२ या आपत्कालीन सेवेवर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गिरीश गणपत नेवसे आणि तुषार शिंदे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी तिथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता होती.

पोलिसांनी बेकायदेशीर जमावाला पांगवून दंगल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी शुभम भीमराव कांबळे, विपुल अजय अवचिते, शुभम अजय अवचिते, ओम मिथुन पाटोळे, गणेश शंकर पाथरकर आणि त्यांच्या इतर साथीदारांनी पोलिसांच्या कायदेशीर आदेशांचे उल्लंघन केले. त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना धमकावले आणि त्यांच्यावर फौजदारीपात्र बलप्रयोग केला. या हल्ल्यात पोलीस शिपाई गिरीश नेवसे हे दुखापतग्रस्त झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.

या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ११५(१), १२१(१), १३२, १९५(१), २२१, ३(५) तसेच आर्म्स ॲक्ट कलम ४ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असून त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सध्या या गुन्ह्याचा तपास बारकाईने सुरू आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी तांत्रिक व वैज्ञानिक पुरावे गोळा केले जात आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पोलिसांवर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा नसून तो कायद्याच्या व्यवस्थेवरचा हल्ला आहे. त्यामुळे नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. कायदा मोडणाऱ्यांवर यापुढेही कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे