Breaking
अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिकसोशल मिडिया

बारामती: ‘डिजिटल अरेस्ट’ ही अफवा, सायबर भामट्यांपासून सावध राहा; पोलिसांचे बारामतीत मार्गदर्शन

0 8 0 7 2 7

बारामती : आजच्या काळात चोर घरात घुसून चोरी करण्याऐवजी मोबाईलद्वारे नागरिकांची आयुष्यभराची कमाई क्षणांत लुटत आहेत. सायबर गुन्हेगार तुमची बुद्धी नव्हे, तर घाई आणि भीतीचा फायदा घेतात. त्यामुळे स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाने सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहणे ही काळाची गरज बनली आहे, असे मार्गदर्शन बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले.

बारामती तालुका पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या वतीने विद्यानगरी येथील गदिमा हॉलमध्ये शनिवारी (दि. १ ऑगस्ट) सायबर जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ ते १ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांतील सुमारे १५०० ते १८०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक नारायण पवार, विद्या प्रतिष्ठान कॉलेजचे उपप्राचार्य खोत सर यांच्यासह एमआयडीसी कंपनीतील व्यवस्थापन, पोलीस पाटील, स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना, एमआयडीसी प्रतिनिधी, शांतता समिती, ज्वेलर्स असोसिएशन, बँक अधिकारी-कर्मचारी आणि विद्यानगरीतील कला, वाणिज्य, विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना पोलीस अधिकाऱ्यांनी वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पद्धतींवर प्रकाश टाकला. सध्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सीबीआय, ईडी किंवा आरबीआय अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना घाबरवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, भारतात ‘डिजिटल अटक’ अशी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नाही. असा कॉल आल्यास न घाबरता तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
तसेच क्युआर कोड (QR Code) स्कॅन केल्याने पैसे मिळत नाहीत तर खात्यातून कापले जातात. बँक कधीही फोनवर ओटीपी, पिन किंवा सीव्हीव्ही विचारत नाही. त्यामुळे आपली कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. बनावट लिंक, व्हॉट्सॲप हॅकिंग, नोकरीचे व जास्त नफ्याचे आमिष, एनीडेस्कसारखे ॲप्स, सेक्सटॉर्शन आणि पार्सल फसवणूक यांसारख्या विविध गुन्ह्यांची माहिती देऊन त्यापासून कसे वाचावे, याचे साधे नियम समजावून सांगण्यात आले.
फसवणूक झाल्यास काय करावे?
सायबर फसवणूक झाल्यास लाजू नका किंवा घाबरू नका. पहिले २४ तास (गोल्डन अवर) अत्यंत महत्त्वाचे असतात. तत्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर कॉल करा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवा. व्यवहाराचे सर्व पुरावे जतन करा, जेणेकरून गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.
या कार्यक्रमात सायबर सुरक्षेसोबतच अमली पदार्थ विरोधी जनजागृती आणि आपत्कालीन मदतीसाठी ‘डायल ११२’ या सुविधेबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. घरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचवून ‘सायबर सुरक्षित भारत, सुरक्षित नागरिक’ हा संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे