अभिव्यक्तीकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आता सोपी नाही! केवळ उसाचा भाव नाही, तर प्रस्थापित व्यवस्थाच बदलण्याचा सभासदांचा मनसुबा

0
8
5
9
4
5
सोमेश्वरनगर: सहकार क्षेत्रातील बारामती,इंदापूर व दौड तालुक्यातील महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या ‘सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या’ आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. आजवर या कारखान्यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व राहिले. मात्र, आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. ही निवडणूक प्रस्थापित सत्ताधाऱ्यांसाठी अजिबात सोपी आणि साधी राहिलेली नसून, त्यांना यावेळेस एका अभूतपूर्व आणि कडव्या संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.

प्रस्थापित सत्ताधाऱ्यांकडून ‘उसाला चांगला भाव दिला’ हा एकमेव निकष लावून जर निवडणूक सोपी जाईल अशी आशा बाळगली जात असेल, तर ती मोठी चूक ठरू शकते. कारण, उसाला चांगला भाव देणे हे आजचे विरोधक किंवा सत्तेवर येण्यासाठी उत्सुक असणारे इतर पक्षही सहज करू शकतात. खरा मुद्दा आता उसाच्या दराचा राहिला नसून, कारखान्यावरील प्रस्थापित व्यवस्था आणि गेली अनेक वर्षे ठाण मांडून बसलेली लोकं बदलण्याचा पक्का मनसुबा आता सभासदांनी केल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
सध्या प्रस्थापितांच्या विरोधात केवळ उसाच्या भावावरून त्रागा किंवा रोष नाही, तर कारखाना व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारापासून ते इतर अनेक गोष्टींपर्यंत प्रचंड नाराजी आहे. हा रोष केवळ सभासदांपुरताच मर्यादित नाही, तर कारखान्यावर आणि सभासदांवर अवलंबून असणाऱ्या इतर अनेक घटकांमध्येही तीव्र संताप खदखदत आहे. सत्तेच्या सावलीत ज्यांनी आजपर्यंत स्वतःच्या पोळ्या भाजून घेतल्या, त्यांच्याबद्दलची ही चीड आता उघडपणे बाहेर येत असून, येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम निवडणुकीच्या रिंगणात नक्कीच पाहायला मिळतील.




