अपघातब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिकसोशल मिडिया
जेजुरी अग्निकांड: MPK न्यूजच्या दणक्याने प्रशासन हादरले! ‘केमिकल भंडाऱ्या’च्या रॅकेटवर अखेर FDA ची धाड १६ जण होरपळल्यावर यंत्रणेला आली जाग; दुकानांतून नमुने जप्त, संशयित पिकअप ताब्यात.

0
5
4
4
3
4
जेजुरी : “जोपर्यंत मोठा अनर्थ घडत नाही, तोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही,” याचा दुर्दैवी प्रत्यय जेजुरीत आला आहे. कुलदैवत खंडोबाच्या गडावर विजयाचा जल्लोष सुरू असतानाच ‘केमिकल भंडाऱ्या’चा भडका उडाला आणि आनंदाचे रूपांतर आक्रोशात झाले. या अग्नितांडवात १६ जण गंभीररीत्या भाजले. या घटनेनंतर ‘महाराष्ट्र पोलीस कारनामा’ने (MPK News) सातत्याने आवाज उठवताच, कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाला अखेर जाग आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सोमवारी सायंकाळी जेजुरीच्या बाजारपेठेत धडक कारवाई केली.
निवडणूक निकालानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी कार्यकर्ते मल्हार नाट्यगृहाच्या पायरीवर नतमस्तक होत होते. दुपारी ३ वाजता भंडारा उधळला गेला आणि क्षणार्धात आगीचा लोळ उठला. शुद्ध हळदीचा स्फोट होणे शक्य नसताना, या भंडाऱ्यात घातक रसायने असल्याचे स्पष्ट झाले. या आगीत महिलांच्या साड्या आणि केसांनी पेट घेतला. १६ जण आगीच्या विळख्यात सापडले, ज्यापैकी १४ जणांवर अजूनही वेदनादायक उपचार सुरू आहेत.
MPK News इम्पॅक्ट: रात्रीतून चक्रे फिरली!
ही घटना उघडकीस येताच प्रसारमाध्यमांनी आणि विशेषतः ‘MPK News’ ने प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे वाभाडे काढले. याचे परिणाम तात्काळ दिसून आले
* धडक मोहीम: अन्नसुरक्षा अधिकारी, पुणे विभाग यांच्या पथकाने जेजुरी बाजारपेठ पिंजून काढली.
* नमुने सील: दुकानांमधून भंडाऱ्याचे संशयास्पद नमुने जप्त करून ते तातडीने पुणे येथील राज्य अन्न औषध प्रयोगशाळेत (Laboratory) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती अन्नसुरक्षा अधिकारी क्रांतीबाराव कर यांनी दिली.
* वाहन जप्त: भेसळयुक्त भंडारा विक्रीसाठी साठा केलेले एक छोटे पिकप वाहन देखील पथकाने ताब्यात घेतले आहे.
८ महिन्यांपूर्वीच वाजली होती धोक्याची घंटा!
प्रशासनाचा बेजबाबदारपणा इथेच संपत नाही. जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी तब्बल ८ महिन्यांपूर्वीच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना पुराव्यासह या ‘ज्वलनशील भंडाऱ्या’बाबत तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने केवळ ‘कागदी घोडे’ नाचवले. “जर त्यावेळीच कारवाई झाली असती, तर आज १६ निरपराध लोकांवर ही वेळ आली नसती,” अशी संतप्त प्रतिक्रिया आता नागरिक व्यक्त करत आहेत.
या कारवाईत अन्नसुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे, डॉ. संदीप शिंदे, ड्रग्स इन्स्पेक्टर रजिया शेख, जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक वाकचौरे आणि अधिकारी अण्णासाहेब देशमुख सहभागी होते.
केमिकल युक्त भंडाऱ्यामुळे त्वचेचा कर्करोग, अंधत्व आणि फुफ्फुसाचे गंभीर विकार होऊ शकतात. यात्रा काळात लाखो भाविक जमतात, तिथे असा स्फोट झाला असता तर कल्पनाही करवणार नाही एवढी जीवितहानी झाली असती.
प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळे भाविकांचा जीव स्वस्त झालाय का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
“पुढील काळात भेसळयुक्त भंडारा विक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यासाठी ग्रामस्थ व खांदेकरी मंडळातर्फे तीव्र मोहीम राबवली जाईल,” असे मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे यांनी स्पष्ट केले आहे. तर, “दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी दिले आहे.
MPK News चा सवाल,
केवळ नमुने तपासून आणि वाहन जप्त करून भागणार नाही. भाविकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या आणि जीवाशी खेळणाऱ्या या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या पोलीस आवळणार का? की हे प्रकरणही कालांतराने थंड बस्त्यात जाणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र पोलीस कारनामा
MPK NEWS
(जनतेचा आवाज, सडेतोड भूमिका!)







