कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र
महावितरण कार्यालयात वीज ग्राहकांची गांधीगिरी, देवळालीप्रवरा येथे संतप्त ग्राहकांचे आंदोलन, महावितरणला दिला ‘चले जाव” नारा

0
7
7
3
2
9
अहिल्यानगर जिल्हा (प्रतिनिधी)

राहुरी : देवळाली प्रवरा येथील महावितरचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. रविवारी कोणतेही वादळ आणि पाऊस नसतानाच चक्क महावितरणने तब्बल 16 तास बेकायदा वीजपुरवठा बंद ठेवल्याने अनेक वीज ग्राहकांचे मोठे नुकसान झाले. तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाल्याने घरगुती ग्राहकांचे नुकसान झाल्याने संतप्त ग्राहकांनी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात जाऊन अधिकार्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली. दरम्यान, आंदोलकांची चाहूल लागताच महावितरणचे संबंधित अधिकारी तेथून पसार झाले. त्यामुळे संतप्त ग्राहकांनी त्यांचा निषेध करून अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. विजेचा खेळ खंडोबा तात्काळ थांबवावा. अधिकाऱ्यांनी मनमानी थांबवावी.

यावेळी राजेंद्र लांडगे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात महावितरणकडून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. अधिकार्यांची मनमानी सुरू असून कर्मचारी देखील वसुलीसाठी महिलांना व वीज ग्राहकांना अरेरावी करत वेठीस धरतात. यामुळे उद्रेक झाल्याने वीज ग्राहक संतप्त झाले. या परिसरात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या अक्षरशः जमिनीवर लोळत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.ग्राहकांच्या जीवाशी खेळू नका. वीज वितरणाकडे महावितरणचे दुर्लक्ष झाले आहे. रविवारी राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात पाऊस आणि वादळ नसतानाही तब्बल 16 तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना विजेविना रात्र काढावी लागली. त्याबाबत विचारणा केली असताना अधिकारी आणि कर्मचार्यांनी नागरिकांना अरेरावी केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या मुजोर कर्मचारी आणि अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अनेक दिवसापासून विजेचा लपंडाव खेळणार्या महावितरण कंपनीला संतप्त ग्राहकांनी शेवटी अकार्यक्षम ठरल्याने चले जावचा नारा दिला. सुधारणा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी शेवटी दिला आहे.

यावेळी राजेंद्र लांडगे म्हणाले की, विजेची अनिश्चितता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली सामान्यांची व शेतकर्यांची होणारी लूट महावितरण कंपनीने तात्काळ थांबवावी. अखंडीत वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांच्या भावना तीव्र स्वरूपाच्या झाल्या आहेत. कारण नसतानाही विजेचा खेळखंडोबा झाल्याने सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक कामगार पठाणी वसुली करतात. जाणूनबुजून वीज कनेक्शन खंडीत होण्याच्या भितीने ग्राहकांना धमकावणे बंद करावे, असा इशारा लांडगे यांनी दिला आहे.
यावेळी शांती चौक मित्र मंडळ अध्यक्ष दीपक त्रिभुवन, भास्कर कोळसे, दत्ता गागरे, राजेंद्र साळवे, शामकांत खडके, तैनूर पठाण, अरुण पठारे, अनिस पठाण, सुरेश काळे, सुनील संचेती, राजू शेख इत्यादी वीज ग्राहक उपस्थित होते.





