गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
बाप-बेट्याची ‘गँग’ आणि पिकअपभर हत्यारे; वडगाव निंबाळकर पोलिसांचा ‘सिंघम’ स्टाईल सर्जिकल स्ट्राईक!

0
6
1
5
8
4
वडगांवर निंबाळकर : मध्यरात्रीची शांतता…
गाढ झोपेत असलेलं गाव…
आणि त्याच अंधाराचा फायदा घेत शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसणारी एक पिकअप जीप. ही जीप साधीसुधी नव्हती, तर त्यात तलवारी, कोयते आणि लोखंडी रॉड असा ‘मोबाईल शस्त्रसाठा’च होता. शेतकऱ्यांच्या काळजाचा तुकडा असलेल्या पशुधनावर डल्ला मारणाऱ्या या खतरनाक आंतरजिल्हा टोळीचा वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ‘गेम’ केला आहे. विशेष म्हणजे या कारवाईत बाप-बेट्यांच्या टोळीचा कारनामा उघड झाला असून, पोलिसांनी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवले आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघळवाडी आणि वाणेवाडी परिसरातून अचानक शेतकऱ्यांच्या गोठ्यातून शेळ्या-बोकड गायब झाले. कष्टाने वाढवलेले पशुधन चोरीला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी तपासाचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी हे आव्हान स्वीकारले आणि सुरू झाले पोलिसांचे ‘मिशन २४ तास’!
तपासाची चक्रे वेगाने फिरली. खबऱ्यांचे नेटवर्क आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचे पथक सातारा जिल्ह्यातील शिरवळमध्ये पोहोचले. सटवाई कॉलनीतील एका संशयास्पद गोठ्यावर पोलिसांनी छापा टाकला. आतमध्ये जे दृश्य होते, ते पाहून पोलीसही अवाक झाले. चोरीला गेलेली ३२ जनावरे तिथे दाटीवाटीने बांधून ठेवण्यात आली होती.
पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या MH-11-DD-4562 या पिकअप जीपची झडती घेतली असता, धक्कादायक माहिती समोर आली. ही गाडी केवळ जनावरे वाहण्यासाठी नव्हती, तर दरोडा टाकण्यासाठी सज्ज होती. गाडीमध्ये २ तलवारी, ३ कोयते, १ लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायव्हर, कटर आणि चाकू असा घातक शस्त्रसाठा लपवून ठेवला होता.
या कारवाईत पोलिसांनी मुख्य सूत्रधार अशोक बाबुराव जाधव (वय ५५) याला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, चोरीच्या या धंद्यात त्याने आपल्या दोन मुलांनाही सामील केले होते. त्याची दोन मुले प्रकाश आणि मयूर हे दोघेही सराईत गुन्हेगार असून तडीपार आहेत. हे तिघे आणि त्यांचे साथीदार निलेश व एक अल्पवयीन मुलगा मिळून पुणे आणि सातारा जिल्ह्यात धुमाकूळ घालत होते.
फरारी आरोपी प्रकाश जाधव आणि मयूर जाधव हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत.
प्रकाश जाधव याच्यावर खंडाळा, शिरवळ, भारती विद्यापीठ, हडपसर, वाणवडी, खडक आणि बारामती पोलीस ठाण्यात दरोडा, मारामारी, आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये तब्बल १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मयूर जाधव याच्यावर विनयभंग आणि मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.
”शेतकऱ्यांचे अश्रू पुसल्याचे समाधान”
– गणेश बिरादार,
या धडाकेबाज कामगिरीबाबत बोलताना अपर पोलीस अधीक्षक (बारामती विभाग) गणेश बिरादार यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “शेतकरी आपल्या पशुधनावर मुलाप्रमाणे जिवापाड प्रेम करतो. तेच पशुधन चोरीला गेल्यावर त्याला होणारे दुःख शब्दांत मांडता येत नाही. आरोपींनी शिरवळमध्ये एक शेड तयार करून तिथूनच चोरीच्या मालाची विल्हेवाट लावण्याचे रॅकेट चालवले होते. मात्र, आमच्या टीमने २४ तासांच्या आत ही टोळी जेरबंद केली. शेतकऱ्यांचे चोरीला गेलेले पशुधन आणि कष्टाची कमाई त्यांना परत करताना आज पोलिसांना वेगळेच आत्मिक समाधान मिळत आहे.”
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, व पो.नि. अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली खालील टीमने केली





