गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
खाकीचा थरार! बारामतीत धडाकेबाज कारवाई, बारामतीत पोलिसांच्या नाकाबंदीचा धसका; २.३५ कोटींचा ४७० किलो गांजा सोडून तस्कर फरार

0
6
7
6
9
3
बारामती : होळीच्या उत्सवात अंमली पदार्थांचे विष कालवण्याचा आंतरराज्य टोळीचा मोठा डाव बारामती पोलिसांनी अत्यंत शिताफीने उधळून लावला आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे तस्करांची अशी काही गाळण उडाली की, तब्बल २ कोटी ३५ लाख रुपये किमतीचा ४७० किलो गांजा भरलेले ड्रम रस्त्यावरच टाकून आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. बारामती पोलीस दलाच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी आणि धडाकेबाज कारवाई मानली जात आहे.
दिनांक २८/०२/२०२६ रोजी बारामती विभागात गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी, रात्रगस्त आणि कडक वाहन तपासणीचे आदेश दिले होते.
या मोहिमेदरम्यान पोलीस यंत्रणेने संशयित मार्गांवर आपले जाळे विणले होते. खाकी वर्दीचा हा कडक बंदोबस्त आणि ठिकठिकाणी सुरू असलेली कसून तपासणी पाहून अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले. पोलिसांच्या हाताला लागण्यापेक्षा मालाची विल्हेवाट लावणे त्यांनी पसंत केले.
मिळालेल्या माहितीनुसार, तस्कर गांजाची मोठी खेप घेऊन बारामतीच्या दिशेने येत होते. मात्र, जळोची-पिंपळी रोड परिसरात पोलिसांची प्रभावी नाकाबंदी असल्याचे पाहून आरोपी घाबरले. पकडले जाण्याच्या भीतीपोटी त्यांनी मौजे जळोची येथील एका शेताच्या मोकळ्या रानात गांजाचे दोन अजस्त्र ड्रम फेकले आणि तिथून पलायन केले.




