Breaking
अभिव्यक्तीनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

‘दादा, आज तुम्ही असता तर आम्हाला न्याय मिळाला असता…’; बारामतीत कामगाराचे ‘आमरण उपोषण’ चौथ्या दिवशीही सुरूच

युनायटेड स्पिरीट (पिंपळी) कंपनीच्या प्रशासनाविरोधात कामगारांचा एल्गार; ३५ वर्षांच्या सेवेनंतर ५ कामगारांना घरचा रस्ता दाखवल्याने संताप

0 6 5 0 6 8

बारामती : “दादा, आज आपण असता तर आम्हाला न्याय मिळाला असता, पण आपल्या नसण्याने आम्हा कष्टकरी कामगारांवर अन्याय होतोय. याची दखल घेण्यासाठी कुणाकडे जायचं? आपली उणीव आज आम्हाला तीव्रतेने भासत आहे…” अशा अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या व्यथा मांडत बारामतीतील पिंपळी येथील युनायटेड स्पिरीट लि. (अ-डॅजो ग्रुप) कंपनीच्या गेटसमोर कामगाराने आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा चौथा दिवस असूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने उपोषणकर्त्यासह इतर कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पिंपळी येथील युनायटेड स्पिरीट या दारू निर्मिती करणाऱ्या कंपनीत गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून एकनिष्ठेने काम करणाऱ्या ५ अनुभवी कामगारांना दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी अचानक कामावरून काढून टाकण्याचे पत्र देण्यात आले. कंपनीच्या नवीन जनरल मॅनेजरने काही युनियन प्रतिनिधींना हाताशी धरून, २०२२ ते २०२४ या काळातील जुन्या रजांचे रेकॉर्ड काढून ही कारवाई केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. यामध्ये मशिन ऑपरेटर हेमराज साहेबराव जगताप यांच्यासह अन्य ४ कामगारांचा समावेश आहे.

उपोषणकर्ते हेमराज जगताप यांनी कंपनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, “पूर्वी कंपनीत खेळीमेळीचे वातावरण होते, मात्र नवीन जनरल मॅनेजर आल्यापासून कामगारांवर दहशत बसवली जात आहे. दारूची फॅक्टरी असूनही कामगारांना येता-जाताना मशिन लावून तपासले जाते, त्यांना अपमानित केले जाते. ‘मला जुन्या कामगारांची गरज नाही, मी कंत्राटी कामगारांकडून काम करून घेईन’ अशी धमकी देऊन आमचा छळ केला जात आहे.”

कमी करण्यात आलेल्या सर्व कामगारांची केवळ ५ ते ७ वर्षांची सेवा शिल्लक राहिली आहे. ३५ वर्षे रक्ताचे पाणी करून कंपनी उभी करणाऱ्या या कामगारांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या हक्काच्या पैशांपासून वंचित ठेवण्यासाठीच ही ‘खेळी’ खेळली जात असल्याचा आरोप होत आहे.

“आम्ही घरातील कर्ते पुरुष आहोत, मुलांची शिक्षणं आणि लग्नं बाकी आहेत. अशा वेळी आम्हाला रस्त्यावर आणणे हा अन्याय आहे,” अशी भावना कामगारांनी व्यक्त केली.

सोमवार, दि. २ मार्च २०२६ पासून हे कामगार कंपनी गेटवर आमरण उपोषणाला बसले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस प्रशासन आणि कामगार आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. “जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि ही अन्यायकारक कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत आमचे उपोषण मागे घेणार नाही. या काळात आमच्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्यास कंपनीचे जनरल मॅनेजर, एच.आर. विभाग आणि संबंधित युनियन लीडर जबाबदार असतील,”असा इशारा हेमराज जगताप यांनी दिला आहे.

“मला जुन्या कामगारांची गरज नाही, मी कंत्राटी कामगारांकडून काम करून घेईन,” ही प्रशासनाची भाषा केवळ धमकी नाही, तर ती ३५ वर्षे कंपनीसाठी रक्त आटवणाऱ्या निष्ठावान कामगारांच्या अस्तित्वावर केलेला घाला आहे. यातून कंपनी प्रशासनाला नेमका काय संदेश द्यायचा आहे?

ज्या कामगारांनी आपल्या तारुण्याची उभारी या कंपनीला दिली, त्यांना निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना ‘गरज नाही’ म्हणणे, हे प्रशासकीय क्रूरतेचे लक्षण आहे.

कंत्राटी कामगारांचा आधार घेऊन हक्काच्या कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवणे, हे कष्टकऱ्यांच्या संघटित शक्तीला चिरडण्याचे आणि स्वस्त दरात श्रम विकत घेण्याचे धोरण स्पष्ट करते.

कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी त्यांना धमकावणे आणि दहशतीखाली ठेवणे, हे लोकशाही आणि कामगार कायद्याला हरताळ फासणारे आहे.

प्रशासनाने हे विसरू नये की, कंपनी यंत्रांनी नाही तर कामगारांच्या घामाने उभी राहते. 

आज ज्यांना ‘निकामी’ ठरवले जात आहे, त्याच हातांनी या कंपनीचा पाया रचला आहे. हा मुजोरपणा केवळ उपोषणकर्त्यांनाच नाही, तर संपूर्ण कष्टकरी वर्गाला दिलेले आव्हान आहे.

आता या संवेदनशील प्रकरणात शासन आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे